पालकमंत्री जयकुमार गोरे यांची कार्यतत्परता — तरटगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची कार्यतत्परता — तरटगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात
करमाळा : चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीवरील अनेक बंधारे तुटले, नदीने पात्र बदलले आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची गंभीर दखल घेत राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी रात्री आठ वाजता प्रत्यक्ष तरटगाव बंधाऱ्याची पाहणी केली होती.या पाहणीनंतर पालकमंत्री यांनी तातडीने जलसंपदा विभागाला बंधाऱ्याच्या फुटलेल्या भरावाचे काम त्वरित हाती घेण्याचे आदेश दिले. त्यांच्या निर्देशानुसार हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून सध्या बंधाऱ्याचे दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.या संपूर्ण प्रक्रियेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेशभाऊ चिवटे यांनी पुढाकार घेत पालकमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्यानंतर प्रशासनाने त्वरेने प्रतिसाद देत हे काम मार्गी लावले. आज गणेशभाऊ चिवटे यांनी या कामाची पाहणी केली असता ग्रामस्थांनी फोनद्वारे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले.
या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, वाशिंबेचे माजी उपसरपंच अमोल पवार, तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते
"अगदी कमी वेळेत हे काम सुरू झाल्याने आम्ही पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व गणेशभाऊ चिवटे यांचे शतशः आभारी आहोत. त्यांच्या कार्यतत्परतेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व विश्वास निर्माण झाला आहे." युवराज गपाट, माजी सरपंच आळजापूर.
"सीना नदीवरील बंधारे तुटल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई येईल की अशी भीती होती, पण आता दुरुस्तीचे काम झाल्याने आम्ही समाधानी आहोत." हरिदास मोरे, शेतकरी तरटगाव.